राष्ट्रीय महामार्ग ३० वरून छत्तीसगडची राजधानी रायपूरहून बस्तरचं जिल्हा मुख्यालय असणाऱ्या जगदलपूरला जाता येतं. याच मार्गावर वाटेत कांकेर जिल्ह्यातलं चरमा नावाचं एक लहानसं गाव आहे. आणि चरमाच्या जरासा आधी एक छोटा घाटरस्ता आहे. काही आठवड्यांपूर्वी हाच घाट उतरून येत असता शेजारच्या जंगलांमधून डोक्यावर सरपणाच्या मोळ्या घेऊन येणारे १०-१५ गावकरी, बहुतांश स्त्रियाच, माझ्या नजरेस पडले.
हे सगळे जण हमरस्त्याच्या जवळच असणाऱ्या दोन गावातले होते – कांकेर जिल्ह्यातलं कोचवाही आणि बलौंद जिल्ह्यातलं माछांदूर. बहुतेक जण गोंड आदिवासी आहेत आणि सीमांत शेतकरी किंवा शेतमजूर म्हणून काम करतात.


या घोळक्यातल्या काहींनी सायकलवर लाकूडफाटा लादला होता आणि एक सोडता बहुतेक स्त्रियांच्या डोक्यावर मोळ्या होत्या. मी त्यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की शक्यतो रविवारी किंवा मंगळवारी ते पहाटे लवकर घर सोडतात आणि घरच्यासाठी जळण गोळा करून सकाळी ९ पर्यंत परततात.

पण यातले सगळेच जण काही फक्त घरच्यासाठी लाकूड गोळा करत नव्हते. मला असं वाटतं की काही जण लाकडं गोळा करून बाजारात विकणार होते. इथे मोठ्या संख्येने आढळणारे हे वंचित समूहांमधले लोक असं सरपण विकून चार पैसे कमवू पाहतात. या कायमच अस्वस्थ असणाऱ्या प्रदेशातल्या लोकांच्या जगण्याचा हा काडीचा आधार म्हणता येईल.

अनुवादः मेधा काळे