दादर स्थानकात गाडी पोचेतो, तुळशी भगत जुनेऱ्यात बांधलेली पानांचे दोन बोजे घेऊन उतरण्यासाठी तयार असते. किमान ३५ किलोची ही गाठोडी एकेक करत ती फलाटावर टाकते, गाडी सुरु असतानाच. “हा बोजा आधीच टाकला नाही ना तर तेवढालं वजन घेऊन उतरताच यायचं नाही. गाडीत चढणाऱ्यांची घाई कसली असते,” ती सांगते.
मग तुळशी उतरते, फलाटावर तिची गाठोडी जिथे पडलीत तिथे जाते, त्यातलं एक डोक्यावर रचून गिचमिड गर्दीतून वाट काढत स्थानकाच्या बाहेर रस्त्यावरच्या फुलाच्या बाजारात पोचते. तिच्या ठरलेल्या ठिकाणी गाठोडं ठेवते आणि दुसरा बोजा आणण्यासाठी परत फलाटावर जाते. “एका वेळी एकच बोजा डोक्यावरून आणता येतो मला,” ती म्हणते. ही दोन्ही गाठोडी स्थानकातून बाजारात आणण्यातच तिचा अर्धा तास मोडतो.
पण तुळशीचं सगळं काम पाहिलं तर हा अर्धा तास म्हणजे काहीच नाही. सलग ३२ तास काम करते ती. या सगळ्या काळात ती जवळ जवळ २०० किलोमीटरचा प्रवास करते आणि ७० किलोचा माल वाहून आणते. ३२ तासांच्या या कामानंतर तिच्या हाती ४०० रुपये पडतात.


सुमारे आठ तास तुळशी मुरबीचा पाड्यालगतच्या जंगलातून पळसाची पानं गोळा करते, मग घरी परतल्यावर त्याचे नीटनेटके गड्डे बांधते
कामाचा हा लांबलचक दिवस सकाळी ७ वाजता सुरू होतो. ठाणे जिल्ह्यातल्या मुरबीचा पाड्यालगतच्या जंगलांमधे तुळशी पळसाची पानं गोळा करण्यासाठी बाहेर पडते. दुपारी ३ च्या सुमारास ती घरी परतते आणि मुलांसाठी रात्रीचं जेवण बनवते. (“मला वेळ असला तरच मी जेवते, कारण बस चुकवून चालणार नसतं”), मग पानांचे नीटनेटके गड्डे बांधते, मग बस पकडून (किंवा खरंच बस चुकली तर मग टेम्पोतून) तिच्या पाड्यावरून ती १९ किमीवरच्या आसनगाव स्थानकात पोचते, मग तिथून ८.३० च्या सुमारास सेंट्रल लाइनची गाडी पकडते.
दोन तासांच्या प्रवासानंतर ती आसनगावहून ७५ किमीवरच्या मुंबईच्या दादर स्थानकात पोचते. तिच्या ठरलेल्या जागी येऊन स्थिरावेपर्यंत रात्रीचे ११ वाजलेले असतात. तिच्या आधी इतरही बाया बसलेल्या असतात. त्यातल्या बहुतेक जणी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या आहेत.
तिथे, तुळशी पानांचे आणखी गड्डे बांधते आणि जरा विश्रांती घेते, आणि वाट पाहत राहते. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास गिऱ्हाईक यायला लागतं – यातले बहुतेक जण फुलं, कुल्फी किंवा भेळ विकणारे असतात – त्यांना पुडा बांधण्यासाठी किंवा द्रोणासारखा या पानांचा उपयोग होतो. ८० पानांचा एक गड्डा ५ रुपयाला विकला जातो किंवा कधी त्याहूनही कमी. तुळशी ८० गड्डे विकते – एकूण ६४०० पानं. शेवटचं गिऱ्हाईक जाईपर्यंत सकाळचे ११ वाजलेले असतात, मग तुळशी परत मुरबीच्या पाड्याला जायला निघते. घरी यायला तिला दुपारचे ३ वाजतात.
महिन्यातून जवळपास १५ वेळा या ३२ तासाच्या पाळीत काम करून तुळशी सुमारे ६००० रुपयांची कमाई करते – यातले बस, टेम्पो आणि ट्रेनच्या प्रवासावर दर खेपेला ६० रुपये खर्च होतात.

३५ किलोचे दोन बोजे घेऊन गाडीत चढणं आणि उतरणं ही रोजचीच कसरत असते, दादरच्या फूल बाजारात (उजवीकडे), रात्रीत तुळशी पानांचे अजून काही गड्डे बांधून ठेवते
पाऊस झाला असेल तर कधी कधी तिच्या पाड्यापासून ४४ किमीवरच्या धसई गावात ती पानं विकायला नेते, पण तिथे तितकं गिऱ्हाईक मिळत नाही. ३२ तास कामाच्या अशा काही पाळ्यांनंतर ती जराशी ‘उसंत’ काढते आणि घरकाम करते किंवा तिच्या पाड्याजवळच्या रानात मिरच्या, वांगी किंवा इतर भाजी खुडायला जाते.
पावसाळ्यामध्ये ती जास्त करून रानातलं काम करते – वर्षाकाठी पाहिलं तर महिन्याला सरासरी १० दिवस, ३०० रुपये रोजानं. “पावसाळ्यात आम्हाला [दादरच्या बाजारात] बसताच येत नाही. सगळं ओलंचिक्क असतं,” ती म्हणते. “त्यामुळे जून ते सप्टेंबर – मी कधीतरीच बाजारात जाते.”
२०० उंबरा असणाऱ्या मुरबीच्या पाड्याच्या आणि जवळपासच्या गावातल्या इतर ३० जणी पळसाची पानं गोळा करतात. त्या रानातला इतरही माल, उदा. कडुनिंबाची पानं, करवंदं आणि चिंच शहापूर आणि दादरच्या बाजारात विकायला आणतात. या गावांमधले बरेच जण शेतमजुरी करतात, गवंडी काम किवा मासेमारीदेखील करतात.
तुळशी आता ३६ वर्षांची आहे आणि वयाच्या १५ व्या वर्षापासून ती पळसाची पानं गोळा करतीये. तिने आपली आई आणि मोठ्या बहिणीला हे काम करताना पाहिलेलं आहे आणि तीदेखील त्यांना गड्डे बांधायला मदत करायची. “मी कधी शाळा पाहिलेली नाही, हे कामच माझं शिक्षण आणि माझ्या आईला आयुष्यभर हेच काम नेटाने करताना पाहणं हीच माझी शिकवण,” ती सांगते.

तुळशी २८ वर्षांची असताना तिचा नवरा संतोष वारला, तेव्हापासून आपल्या चार मुलांना मोठं करण्याची जबाबदारी तिच्यावरच आहे
सुमारे २० वर्षांपूर्वी तुळशीने पहिल्यांदा दादरपर्यंतचा लांबलचक प्रवास केला असेल. “मी किती वर्षांची होते, ते काही मला आठवत नाही, मी माझ्या आईबरोबर गेले होते. मी काही मोठा बोजा उचलू शकायचे नाही म्हणून मग मी जेवणाचा डबा आणि विळा ठेवलेली पिशवी हातात घेतली होती,” ती सांगते. “त्या आधी मी फक्त बसने प्रवास केला होता. गाडीतल्या बाया आमच्यापेक्षा किती वेगळ्या होत्या. मी विचार करत होते, हे असलं कसलं जग आहे... दादरच्या स्टेशनवर तर पहावं तिथे माणसंच माणसं होती. मी तर गांगरूनच गेले आणि जीव घाबराघुबरा झाला माझा. मी आईचा पदर हाताने घट्ट धरून तिच्याबरोबर चालत होते. त्या गर्दीत चालणंदेखील मुश्किल झालं होतं मला. पण हळू हळू मला या सगळ्याची सवय झाली.”
१७ व्या वर्षी लग्न झाल्यावर तुळशी मुरबीचा पाड्याला आली. तिथनं एक किलोमीटरवर असणाऱ्या अवकळवाडी गावात तिचे आई वडील रहायचे, दोघंही शेतमजूर. १९७१-७२ मध्ये जवळच्या भातसा धरणामुळे विस्थापित झालेल्या ९७ म ठाकूर आदिवासी कुटुंबांपैकी एक तिचं सासर. (See 'Many families just vanished')
२०१० मध्ये तुळशी २८ वर्षांची असताना, तिचा नवरा आजारपणात वारला – तिच्या सांगण्यानुसार त्याला मुळव्याधीचा त्रास होता. मुरबीचा पाड्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र नाही आणि सर्वात जवळचा सरकारी दवाखाना शहापूरला २१ किलोमीटरवर आहे. तो तसंही कुठले उपचार करून घ्यायला राजी नव्हता. “त्याचा मोठा आधार होता मला, पैशाचा पण आणि मनाने पण,” ती सांगते. “तो गेल्यानंतर आमच्याकडे पाहणारं कुणी पण नव्हतं. असं असतानाही तो गेल्यानंतर मी स्वतःला दुबळं किंवा असहाय्य मानून घेतलं नाही कधी. एकट्या बाईला कणखर व्हावंच लागतं. नाही तर तिचं कसं व्हावं?”
आतापर्यंत तुळशीला एकटीलाच तिच्या चारही मुलांचं हवं नको पहायला लागलं आहे – तिचा दिराला फारसं आवडत नसलं तरी कामावर जाताना तिला मुलांना पाड्यावर त्याच्यापाशी सोडून जावं लागतं (तिचे सासू सासरे तिचा नवरा लहान होता तेव्हाच वारले आहेत).
तुळशीची मोठी मुलगी, १६ वर्षांची मुन्नी म्हणते, “आम्हाला तर ती घरी असल्याचं माहितच नाहीये. ती कामाला एकही खाडा करत नाही आणि ती दमत पण नाही. तिला कसं काय जमतं हे याचं आम्हालाच नवल वाटतं.” मुन्नी आता दहावीत आहे. “मला नर्स व्हायचंय,” ती म्हणते. धाकटी गीता आठवीत आणि सगळ्यात लहाना महेंद्र सहावीत आहे.
सगळ्यात थोरला काशीनाथ, वय १८, आता शहापूरच्या डोलखांब गावातल्या न्यू इंग्लिश हाय स्कूलमध्ये अकरावीत शिकतोय. तो तिथेच वसतिगृहात राहतो. “मला शिक्षण पूर्ण करून चांगल्या पगाराची नोकरी धरायचीये,” तो म्हणतो. त्याची वार्षिक फी २००० रुपये आहे आणि वर्षातून दोनदा परीक्षा शुल्क म्हणून ३०० रुपये भरावे लागतात. “मला फक्त काशीनाथची फी भरावी लागते. इतर मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत आहेत [मुरबीचा पाड्यापासून दोन किलोमीटरवरच्या सारंगपुरी गावात],” तुळशी सांगते. “शाळेच्या खर्चाचा घोरच असतो माझ्या जिवाला. पण तरी माझ्या पोरांनी चांगलं शिक्षण घ्यावं अशी फार इच्छा आहे माझी. आमच्या हलाखीतून सुटका होण्याचा तोच एक मार्ग आहे.”


वेळ काढून तुळशी मुलांसाठी खाणं बनवते – काशीनाथ (वर, डावीकडे), मुन्नी (दुसऱ्या रांगेत), गीता आणि महेंद्र (घराच्या दारात बसलेले)
आम्ही तिच्या घरी गप्पा मारत असतानाच पानं आणायला निघण्याची तुळशीची तयारी सुरू होती, विळा आणि पानं आणण्यासाठी जुनेरी घेतलेली कापडाची पिशवी घेऊन ती निघण्यास तयार होती. २०११ मध्ये इंदिरा आवास योजनेअंतर्गत तुळशीच्या कुटुंबाला घरकुल मिळालं आहे.
रात्रीचे ८.३० वाजेतो तुळशी दोन तासाच्या दादरच्या प्रवासाला निघालीये. मग, रस्त्यावरच्या फुलाच्या बाजारात ठरलेल्या जागी बसल्या बसल्या ती अंधारातच पानाचे गड्डे बांधायला सुरु करते. रस्त्यावर नीटसे दिवे नाहीत त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचा जो काही उजेड पडतोय तोच पुरेसा आहे. “आम्ही [बाया] बाहेर बसतो [मुख्य बाजारापसनं दूर], रात्रीच्या वेळी बाजाराच्या [इमारतीच्या] आत आम्हाला सुरक्षित नाही वाटत,” ती सांगते. “पण या सगळ्या गर्दी-गोंगाटातही माझा जीव रमत नाही – गाड्या, गर्दी, वास आणि धूर. आमचा पाडा लहान आहे, पण किती मोकळं वाटतं, घरासारखं वाटतं तिथे. पण हातात पैसा नसेल तर तिथे कसं जगावं? त्यामुळे मग शहराची वाट धरावीच लागते आम्हाला.”
सोबतच्या विक्रेत्या बायांबरोबर रात्रभर दादर मार्केटमध्ये काम करता करता तुळशी एखादा कप चहा घेते, सात रुपयाला, कधी घरून बांधून आणलेली भाजी-भाकरी तरी कधी मैत्रिणीच्या डब्यातला एखादा घास. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी पानं विकून होईपर्यंत ती बाजारात थांबते. “हा बोजा घरी कोण नेतंय,” ती म्हणते.
मग पुन्हा एकदा आसनगावपर्यंत दोन तास गाडीत. “आम्ही चौघी जणी असतो [एकत्र काम आणि प्रवास करतो]. प्रवास करता करता आम्ही एकमेकीला आपली सुखदुःखं सांगतो, घरी काय चाललंय ते बोलतो. पुढं काय करायचंय तेही सांगतो,” तुळशी म्हणते. “पण या गप्पा थोडाच वेळ. बहुतेक वेळा आम्ही चक्क झोप काढतो, थकवाच असतो तसला.”